- आपलं बाह्यस्वरूप वेगळं असलं तरी ते कणांचं बनलेलं आहे,एवढंच काय आपलं अंतरंग हे सुद्धा कणांनी तयार झालेलं आहे.आता महर्षी कणादांनीच सांगून ठेवलंय की ह्या विश्वातील प्रत्येक वस्तू ही कणांची बनलेली आहे..पण अंतरंग कसल्या कणांचं ?? आठवणींच्या कणांचं. हे आठवणींचे कण आपण साठवलेले आहेत आणि कणाकणांनी आयुष्य पुढे ढकलीत आहोत,आयुष्यात त्या आठवणी तरी केवढ्या ? इवलूश्या कणांएवढ्या !! तरी आपण त्या जगतो..त्याच्या आठवणीत रममाण होतो.आता कणाला एवढं महत्व द्यायची तरी काय गरज ? ऐन वैशाखात तहानलेल्या भूमीला जलधारांनी तृप्त करण्यासाठी तो तृषार्त बनून येतो,येतो तरी कसा कण कण थेंबानी, असे अनेक थेंब एकत्र येतात आणि मग बनतो तो प्रवाह.एका विशिष्ठ दिशेत वाहणारा. मला ह्या दिशेने वाहायचं आहे हे ध्येय बाळगून असणारा , मग वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेऊन तो पुढे जाईल वर् जे अडतील त्यांना मोडून तो पुढं जाईल.रंगबिरंगी पानाफुलांमधून तो जाईल, गर्द हिरव्या झाडांमधून तो जाईल,कधी खळखळ करत अवखळ दगडांमधून तो धावेल.कधी एखाद्या डोंगरावरून खाली उतरताना वाऱ्याशी त्याची स्पर्धा लागेल.कधी संथ राहून गौतम बुद्धासारखा तो भासेल.पण किती काळ ? असा तो संथ राहील,विरक्त राहून जीवनाकडे एकसारख्या दृष्टीने बघत राहील ? कधीतरी त्याला याचा कंटाळा येईलच ना ! मग त्याचं ते तारुण्य पुन्हा जाग होईलच ना. म्हणून ते पाण्याचे कण एकत्र येऊन थेंब बनतात. ती थेंबं त्या दगडधोंड्याच्या प्रवाहातून सळसळत्या वेगाने एकमेकांना चिकटून पुढे सरकत राहतात,लुडबुड करत एकमेकांशी खेळत त्या छोट्या पिल्लांचा प्रवास सुरु राहतो आणि ती पिल्लं कड्यापाशी येतात आणि त्यांचं बालपण तारुण्यात बदलतं.तो कातळकडा ह्या बदलाची साक्ष बनतो.ती थेंबं स्वतःला अक्षरशः झोकून देतात तारुण्य तारुण्य म्हणज तरी नक्की काय हो ? नवनवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वतःला अगदी झोकून द्यायचं,पूर्णपणे; असं झोकून दिल्यानंतरच स्वतःच्या सुप्त शक्तींची जाणीव होते ना ! या शक्तीला ओळखून जो तिचा आदर करेल तारुण्य भरभरून देतं अगदी घेण्यासाठी ओंजळ अपुरी पडेल एवढं. अनेक खाचाखळग्यांतून स्वतःला परजून,तावून सुलाखून बाहेर पडल्यावर त्या तारुण्याला एक स्थैर्य प्राप्त होतं, ते स्थैर्य खूप जणांना आधार देतं म्हणूनच तर नदीकाठी जीवन फुलतं.. पाणी धबधब्यातुन नदीत येतं,पदार्थ तोच पण फॉर्म बदलला की रिजल्ट बदलला.. शेवटी नदीसुद्धा समुद्रात जाऊन विसावतेच की कायमची… जन्म, बालपण, तारुण्य हे सगळं ह्या पाण्याच्या फॉर्मसारखं, अगदी सिजनल पण शेवटचं सत्यच अमर… सगळं कसं अगदी 4 दिवसांच्या दिवाळी सारखं,पण हे सिजनल चेंज जर आनंदाने स्वीकारले तर आयुष्य नक्कीच सोप्पं होईल ,नाही का ??
- मूळ कल्पना - मकरंद केतकर
फोटो- ओझर्डे धबधबा


