बाप्पा
आज गणपती आले.सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे..ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन सगळीकडे होतंय. या वातावरणात डेकोरेशनची लगबग आहे, आगमनाचा उत्साह आहे, उत्साहाचा नाद आहे. मूर्तीचं पावित्र्य आहे, मंडळाचे देखावे आहेत.पोरांची धडपड आहे.विसर्जनाची वेळची झिंग आहे..एकूणच काय वातावरण आनंदी आहे..
मला आठवतोय तो माझ्या लहानपणीचा बाप्पा.त्यावेळी आम्ही आमच्या जुन्या घरात देशपांडे वाड्यात रहायचो.
( तीन वर्षांपूर्वीच नवीन घरात शिफ्ट झालो.) गणपती 15 दिवसांवर येऊन ठेपले की मग आम्ही मी आणि बाबा मूर्ती कुंभरवाड्यात ठरवायला जायचो. कुंभार मंडळींची लगबग जून महिन्यापासूनच सुरू झालेली असायची. त्यावेळी मी लहान होतो त्यामुळ विविध गोष्टींची आवड.मग 10-15 मुर्त्या पाहून झाल्या की फायनली मूर्ती ठरायची. गाईवरचा गणपती,बाल गणेश, दगडूशेठ इत्यादी प्रकारचे गणपती आम्ही बसवले होते.म्हणजे ते माझ्या आठवणीत आहेत.
मग बाप्पा अगदी एक-दोन दिवसांवर येऊन ठेपायचा आणि मग विविधवस्तूंची खरेदी सुरू व्हायची डेकोरेशनसाठीची.
मग आदला दिवस उजाडायचा आणि शाळेतून घरी यायचं तोपर्यंत बाबापण कोर्टामधून आलेले असायचे मग डेकोरेशनची लगबग सुरू व्हायची. भिंती रंगवून त्यावर विविध पद्धतीच्या नक्षीकाम केलं जायचं.मग गणपती जिथं बसतो तिथं मखर ठेवायचं मग समयी,पणती, मग त्यावर्षीची वेगळी थीम त्यावर डेकोरेशन व्हायचं.मी ते सगळं खूप एन्जॉय करायचो.बाबा उंचावरचं डेकोरेशन करायचे.स्पेशली माझी आई तिला परफेक्शनची खूप हौस त्यामुळं माझं आणि बाबांच डेकोरेशनच्या बाबतीत तिच्याशी हमखास खटकायचं.. पण तेही मजेमजेतच..
मग गणेशचतुर्थीचा दिवस यायचा.सकाळी लवकर उठून गणपती आणण्यासाठी मी ,बाबा, माझे काका असे आम्ही सगळे एकत्र चालत जायचो.मग ढोल ठरवला जायचा.. ढोल ताशांच्या गजरात आम्ही घरी बाप्पाला घेऊन यायचो.गुरुजी घरी येऊन प्रतिष्ठापना करायचे.आरती व्हायची.
मग सुरू व्हायची मोदकांची लगबग.मी लहानपणी ‘मला एकवीस मोदक खायचेत’हा हट्टच धरून बसायचो मग बाबांची आणि माझी मोदक खायची रेस लागायची मी जोमात सुरुवात केली तरी 4-5 च्या वर माझी गाडी जायचीच नाही.. मित्र घरी गणपती पहायला यायचे, मी त्यांच्या घरी जायचो. रोजची रोज आरती व्हायची.मित्रांच्या घरी आरत्या व्हायच्या. दुर्वा शोधून आणायच्या, गुलबाबक्षीच्या फुलांचा हार केला जायचा. मंडळात मात्र मी कधीच गेलो नाही.अशाप्रकारे गणपतीचे 4-5 दिवस संपल्यानंतर गणपतीचे जिवंत देखावे सुरू व्हायचे.मग मी-आई-बाबा-काकू-सुखदा दीदी असे आम्ही गणपती पहायला जात असू.विसर्जनावेळची तर झिंगच वेगळी होती.साश्रुपूर्ण नयनांनी बाप्पाला निरोप दिला जायचा.
आज गणपती आले आणि फार नॉस्टॅल्जिक व्हायला झालं.
2011 साली बाबा गेल्यानंतर मला मात्र गणपती विघ्नहर्ता आहे की नाही हेच समजत नव्हतं आम्ही मग त्यासाठी विघ्नहर्त्याला त्यासाठी दोषी मानलं कारण आमचं विघ्न त्याने हरलं नव्हतं.मग थोडेफार आठवतात ते मी आणलेले गणपती.
हे दिवस जरी 5-6 वर्षापूर्वीचे असले तरी बाबांच्या आठवणी ज्या डोक्यात फिट्ट बसल्या आहेत त्या मात्र मी गणपती आणतानाच्या नाहीत. बाबा गेलेल्या वर्षी
उचलत नसताना अनवाणी पायांनी आणलेला गणपती आठवतो फक्त ….
आणि आजसुद्धा पूर्वीसारखा मी गणपती बसवतो पण फारसा उत्साह नाही.डेकोरेशन सुद्धा जेमतेम करतो..
पण प्रत्येकवेळी गणपती आणताना बाबा आठवतात त्या पूर्वीच्या आठवणी मनात तरळतात आणि तेवढ्याच आठवणी मला नास्तिक होऊ देत नाही..
©गौरीश देशपांडे