Saturday, 18 August 2018

राजगड भ्रमंती

खुप दिवस होत आले होते लंगडतोड भटकंती करून,म्हणजे तशी माझी भटकंती सुरूच होती पण ती मात्र छोट्या प्रमाणावर मर्यादित होती.मोठ्या 2 दिवसाच्या ट्रेकचा दणका उडवायचा असा मनाशी प्लॅन पक्का केला होता पण वेळ जुळून येत नव्हती.तसा माझा चावंड, शिवनेरीचा ट्रेक थोडक्यातल्या गैरसमजुतीमुळं हुकला होता.
मात्र यावेळी मी वेळ काढलाच, दिवसच असा निवडला की कॉलेजची सुट्टी आणि ट्रेकची भट्टी एकत्रच जमून आली.
तसं त्या ठिकाणी जाऊन रहायचं हे माझं खूप दिवसांपासून मनात साठवलेल स्वप्न होतं
आणि ते सत्यात उतरल 15 ऑगस्टला

आम्ही जात होतो राजगडाला
राजगड म्हणजे राजीयांची राजधानी
राजगड म्हणजे स्वराज्यलक्ष्मीचं सिंहासन
राजगड म्हणजे भव्यतेचं मूर्तिमंत प्रतीक
राजगड म्हणजे दुर्गांचा राजा
राजगड म्हणजे मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा अभिमान
आणि ह्याच स्वातंत्र्याचा अभिमान बाळगत आम्ही जात होतो राजगडावर तेही भारताच्या स्वतंत्रदिनादिवशीच.
किती मोठा योग जुळून आला होता हा.
खरंतर मला राजगडचं वेड हे गोनीदांच्या वाघरु या कादंबरीमुळं लागलं.. तो बाबुदा, हनुवती, यशोदा ही सगळी पात्रं मला खूप भावली होती,मी त्यांच्याकडं आकर्षित झालो होतो. मग काय सकाळी उठलो लवकर , तयार झालो आणि स्टँडवर गेलो.नसरापूर फाट्यावर थांबणाऱ्या गाड्यांची चौकशी आधीच करून ठेवलेली असल्याने जास्त प्रॉब्लेम आला नाही पण गाडीचा वाहक मात्र पक्का गेमर निघाला त्यानं माझ्याकडून स्वारगेटचं तिकीट काढलं आणि नसरापूरला उतरवलं. त्याला मी खूप विनंत्या केल्या की खेड शिवापुरचं तिकीट द्या, कापूरहोळचं तिकीट द्या पण हा गाडीला स्टॉप नाही म्हणून अडूनच बसला.. मी म्हणलं जाऊदे कुठं 5-50 रूपयांसाठी नडा
मग सुरू झाला एसटीचा प्रवास, चंद्र-सूर्य डोंगर, चंदनगड-वंदनगड पाहून मन सुखावलं.. नऊच्या सुमारास मी नसरापूर फाट्यावर उतरलो आणि पुण्याहून येणाऱ्या आमच्या टीमची वाट पहात बसलो मधल्यावेळात एक वडा आणि चहा हाणून घेतला. थोड्यावेळानंतर रोहन आणि त्याचा मित्र पुष्कर आले.
रोहन हा तसा माझा पहिल्यापासूनचा मित्र. त्याच्याबरोबर मी वासोट्याच्या ट्रेकला गेलो होतो आणि आज राजगडावर जात होतो. मग पाठोपाठ निखिल,सूरज,रवी, वैभव आले आणि मग तन्मय आला.
तसं राजगडला बाईक राईड करायची असं मनात होतंच पण बाईक राईड ती पण पावसातून करण्याचं थ्रिल मी त्या दिवशी अनुभवलं. सुरजच्या गिक्सरवर आम्ही तिघे राजगडच्या पायथ्यापर्यंत आलो. सगळी टीम पोहोचल्यावर सुरू झाली ती  राजगडाची चढण..
राजगडाचं ते मनमोहक पावसाळ्यातलं, नटलेलं रूप मी मनोमन साठवून घेत होतो. शेजारी तोरण्याला जाणाऱ्या डोंगराची रांग धुक्यात हरवलेली होती.
राजगड हा गडपुरुष अगदीच शांत भासत होता पण जसजशी चढण सुरू झाली तसतशी त्यानं त्याचं रौद्ररूप दाखवायला सुरुवात केली..राजगड दमवतो फार कुठल्याही बाजूने चढा..
राजगड चढताना मध्ये फुललेली सोनकीची, मिकीमाऊसची फुलं मनाला गारवा देत होती आणि हमखास पाय सटकणाऱ्या वाटेवर मी, तन्मय, आणि वैभव आपापले पाय रोवत पुढे चाललो होतो. तन्मयचा रेनकोटमुळं त्याची फार अडचण होत होती.शेवटी मी तो गोल गुंडाळी केला आणि त्याची दोरी त्याच्या कमरेला गुंडाळण्यासाठी त्याला दिली. वातावरण तर लाजवाब पडलं होतं. त्या वातावरणातून बाहेर पडूच नये असं वाटत होतं,थांबत, फोटो काढत आम्ही राजगडच्या वाटेवर मार्गक्रमण करत होतो.
पायऱ्या लागल्या त्या पायऱ्यातून वळणाची जाणारी वाट एवढी सुंदर होती की त्या पायऱ्या संपूच नये असं वाटत होतं
मग पाली दरवाजा मार्गे आम्ही गडावर गेलो.
गेल्या गेल्या सदरेवरून खाली जाऊन पद्मावती मंदिरात गेलो. दर्शन घेतलं आणि बॅगा ठेवल्या. बाहेर आलो तोवर निखिल दादाने भज्यांची प्लेट पुढं केली. सकाळच्या वडपाववर राजगड चढलो होतो मग काय समोर गरमागरम भजीची प्लेट क्षणार्धात रिकामी केली. अशा एकामागून एक खूप प्लेट आल्या.रेंज थोडीफार होती मग आईला फोन लावला.
आणि भटकंतीला सुरुवात केली.
पहिल्यांदा गेलो सुवेळेकडं ..
सुवेळा पाहिली, तिचे ते बुरुज पाहिले, बांधकाम खरंच अप्रतिम होतं. मग नेढ्यात गेलो
उन्हाळ्यात इथं मधाची पोळी असल्यामुळं जाता आलं नव्हतं त्यामुळं आता चान्स सोडणार नव्हतो.सगळी नेढ्यात गेलो, भारताचा ध्वज आणला होता, त्याच्याबरोबर फोटो काढले आणि पुढं पूर्ण माची पाहिली.
सुवेळा पाहून आलो तेव्हा साडेचार होऊन गेले होते. आल्याबरोबर संतोषरावांनी गरमागरम पिठलं भाकरी वाढली..
पोटभरून ती खाल्ली पाणी पिऊन ढेकर दिला आणि तृप्त झालो. खरं तर आपण एकदा गड चढून जातो तेव्हा एवढे दमतो तर मग ही माणसे मोठं मोठं सामान सोबत घेऊन उन्हापावसात कसे बरं गड चढत असतील ह्या भावनेनं मनात कुतूहल आणि डोळ्यात पाणी एकाच वेळी दाटलं. ही दुनियादारीची रीत माणसांना काय काय करायला लावते हे ही राजगड मला शिकवून गेला.
मग सुरू झाल्या गप्पा.तन्मय केळकर ह्या अफाट ज्ञान असलेल्या माणसाला मी इथं भेटलो.हे खरं तर पेशाने इंजिनियर पण ह्यांनी संस्कृत पुस्तक लिहिलं आहे आणि सध्या ते शीख तत्वज्ञानाचा अभ्यास करत आहेत. ह्या माणसाला किती भाषा बोलता याव्यात बरं
मराठी, हिंदी,कन्नड,इंग्लिश,संस्कृत,रशियन,गुजराती,उर्दू
तन्मय,सूरज ह्यांच्याबरोबर अफाट गप्पा रंगल्या.सूरज सारखा उत्साही कार्यकर्ता प्रत्येक टीममध्ये हवाच कारण आमचे पाय दमलेले असताना हा आणखी दोघांना सोबत घेऊन बालेकिल्ला चढून आला.
स्लीपिंग बॅग मध्ये झोपुन तसेच एका दिवसात जिवलग झालेल्या दोस्तांबरोबर गप्पा मारताना आपण भाग्यवान आहे ह्याची जाणीव झाली. दिवस उजाडला
चहा पिऊन संजीवनी माचीकडे गेलो. संजीवनी माची खरंच संजीवनी देते.तिचं ते रूप अफाट आहे.त्यातले चिलखती बुरुज, चिलखती तटबंदी म्हणजे केवळ अफाट.
दोन तास संजीवनी माची बघण्यात गेले. पावणे अकरा  वाजत आले होते. बालेकिल्ला झाला असता पण टीम मधल्या काही सदस्यांना नोकरीला जायचे असल्याने गड उतरावा लागला..
दगडानी भरलेल्या निसरड्या वाटेवर पाय जपून टाकत गड उतरला..
गड उतरल्यावर गडाचं रूप पुन्हा एकदा पाहिलं आणि
मनी एक भावना उमटली की मी स्वातंत्र्यदिनादिवशीच
राजगडावर स्वातंत्र्य अनुभवलंय, मन मोहरून उठलं आणि मी
समाधानानं सातारच्या वाटेवर निघालो..

©गौरीश देशपांडे





No comments:

Post a Comment

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, a...